वर्धा : सावंगी येथील सिख वस्ती जवळील स्मशानभूमीत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

सावंगी परिसरातील विविध वसाहतींमध्ये सुमारे 60 ते 65 हजार नागरिक वास्तव्यास असून या सर्वांसाठी सदर स्मशानभूमीचा वापर केला जातो. मात्र, गेल्या वर्षभरापासून येथे अंत्यविधीसाठी आवश्यक लाकूड, गोवऱ्या व इतर साहित्याची सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. परिणामी नागरिकांना अंत्यविधीसाठी वर्धा येथील पुलफैल स्मशानभूमीकडे जावे लागत असून, यामुळे अतिरिक्त मानसिक व आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.
नागरिकांनी स्मशानभूमीत लाकूड, गोवऱ्या, बसण्यासाठी बाके, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रेत जाळण्यासाठी शेड तसेच उन्हाळा व पावसाळ्यात आसरा मिळेल अशा सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यासोबतच मृत्यू नोंदणीची सोय सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
सुमारे 200 नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी प्रशांत जारुंडे, रवी पाणबुडे, अमित देशभ्रतार, मेश्राम साहेब, किशोर मस्के, गणेश भस्मे, विशाल शेंडे, संकेत शंभरकर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.




